मुंबई : राज्यात कोरोना आणि नंतर बारावीच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण आणि आता अहमदनगर येथे दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरविण्यासाठी आलेल्या पालकांकडून सुरक्षा पथकावर झालेल्या दगडफेकीमुळे गुरुवारी विधानसभामध्ये वातावरण तापले. विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी यावेळी संताप व्यक्त करत हे सर्व प्रकार थांबले नाही तर शैक्षणिक क्षेत्राचे वाटोळे होणार असल्याची भीती पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी-मानुर (ता. पाथर्डी) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्या-काठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली. ते परीक्षा केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर आहे.
अजित पवार यावेळी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात असे कॉपीचे आणि पेपरफुटीचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार न थांबल्यास राज्याचे वाटाळे होईल. सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन या विरोधात कडक भूमिका घेण्याची आम्ही मागणी करतो, पाथर्डीतील या घटनेबरोबरच जालन्यात परीक्षेदरम्यान जिल्हा परीषद शाळा, सेवली या केंद्रावर आमच्या पाल्यांना कॉपी करू द्या अन्यथा तुम्हाला जीवे मारू अशा धमक्या केंद्र संचालक व पर्यावेक्षक यांना देण्यात आल्या असल्याचे अजित पवार म्हणाले.