शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या शिष्ठमंडळाने ठाणे पोलीस आयुक्त यांची घेतली भेट
ठाणे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसैनिकांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल खासदार राजन विचारे व शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या शिष्ठ मंडळ ठाणे यांनी आज ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांची भेट घेतली. त्यावेळी लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, शहर प्रमुख प्रदीप शिंदे उपस्थित होते. कपात केलेले अंगरक्षक पोलीस यांची सुरक्षा पुन्हा देण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना ईमेल द्वारे पत्र पाठविण्यात आले आहे.
या पत्रामध्ये ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांवर व कार्यकर्त्यावर सूडबुद्धीने १) तडीपारी २) एम आर टी पी ३) प्रक्षोभक भाषण कलम १५३, ५००, ५०४ अंतर्गत नेत्यांवर गुन्हे ४) अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या चाप्टर केसेस ५) आक्षेपार्य घोषणा दिल्याबाबत अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३),१३५ अन्वये अनेक कार्यकर्त्यांना दिलेल्या नोटीसा तसेच शिंदे गटाकडुन शाखा बळकावणे, वाचनालय बळकावणे, वषानुवर्षे आनंद चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सुरु असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या जागेवर हक्क सांगणे, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना धमक्या देणे. इत्यादी चिथावणीखोर प्रकार तथाकथीत स्वतःला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन होत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची शक्यता शक्यता वर्तवली आहे. तरी सुद्धा आमच्याकडून संयम ठेवलेला आहे. असे पत्रामध्ये नमूद केले आहे.
आज ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांचा ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर या शहराशी संलग्न असलेला लोकसभा मतदार संघ असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वारंवार रात्री – अपरात्री फिरावे लागते. त्यामुळे नागरिकांशी थेट जनसंपर्कामुळे मतदार संघात सन २०१९ ला लोकसभेच्या निवडणुकीत ७ लाख ४०हजार ९६९ मते मिळून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु शासनाने सूडबुद्धीने त्यांचे अंगरक्षक पोलीस संरक्षणात कपात केल्यामुळे हा एक षडयंत्राचा भाग असू शकतो अशी शंका निर्माण झाली आहे. ज्या शिंदे गटात ज्यांना शासकीय व राजकीय असे कोणतेही उच्च पद नाही त्यांना पोलीस अंगरक्षक पुरविण्यात येतात. परंतु लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी खासदार राजन विचारे यांची अंगरक्षक पोलीस सुरक्षा कमी केल्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांचे अंगरक्षक पोलीस सुरक्षा पूर्वरत करण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. तसेच दुर्दैवाने अशी काही दुर्घटना घडल्यास त्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडवणीस जबाबदार राहतील असे पत्रामध्ये म्हटले आहे.