मुंबई : राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून सत्ता संघर्ष सुरू असताना आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या नवीन आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, चव्हाण यांच्या दाव्यानुसार राज्यात भाजपची सत्ता येण्यास राष्ट्रवादी कारणीभूत आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
चव्हाण म्हणाले, राज्यात २०१४ मध्ये आघाडीचे सरकार कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील भाजप वाढण्यास, सत्तेत येण्यास मदत झाली. एकप्रकारे यानंतर आलेले देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राष्ट्रवादीमुळेच आल्याचा आरोप त्यांनी केला.
आमचे आघाडीचे सरकारचे काम चांगले होते. परंतु या सरकारवर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता आणि आघाडीपासून दूर झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने हे सरकार पाडले नसते, तर पुन्हा आघाडीचेच सरकार सत्तेत आले असते. मात्र तसे न झाल्यामुळे याचा फायदा भाजपला झाला.