मुंबई : काँग्रेस सर्वांना संधी देणारा पक्ष असून एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून देऊन एक इतिहास घडवला आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे अनुभवी, कुशल प्रशासक व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी झटणारे नेते आहेत. त्यांच्या प्रदिर्घ अनुभवाखाली काँग्रेस देशात पक्ष पुन्हा एकदा उभारी घेईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक पक्षकार्यालय टिळक भवन येथे प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अभिनंदनाचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला व त्याला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुमोदन दिले.
या बैठकीला विधिमंडळ अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसुझा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगढी, माजी मंत्री यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, माजी राज्यमंत्री बंटी पाटील, डॉ. विश्वजित कदम, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, आशिष दुवा, संपतकुमार, सोनल पटेल, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, खा. कुमार केतकर, माजी खा. हुसेन दलवाई, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, आ. विकास ठाकरे, आ. वजाहत मिर्झा, आ. अभिजित वंजारी, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार यांच्यासह प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे, मल्लिकार्जुन खर्गे यांची लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन अध्यक्षपदी निवड झाली आहे. एक कामगार कुटुंबातील व्यक्ती देशातील सर्वात जुन्या पक्षाचा अध्यक्ष होतो ही ऐतिहासिक घटना आहे. काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांना हे चोख उत्तर आहे. राहुलजी गांधी यांनी अध्यक्षपद स्विकारावे असा विनंती प्रस्ताव महाराष्ट्रासह इतर प्रदेश काँग्रेस कमिटींनीही केला होता पण त्यांनी तो नाकारून पक्षातीलच इतर व्यक्तीने अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी अशी भूमिका घेतली होती.