एका विद्यार्थ्यांकडून दहा ते बारा हजार घेतल्याचे संशय ; बोर्डाचा पेपर फुटला नसल्याचा दावा खोटा
मुंबई (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोणताही गैरप्रकार झाले नसल्याचा दावा बोर्डाकडून करण्यात आले होते मात्र पोलिस तपासामध्ये बारावीच्या गणित विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच व्हाट्सअप ग्रुपवर आली असल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्याचप्रमाणे सायबर सेलकडून संबधित व्हाट्सअप ग्रुपदेखील रिकव्हर करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांच्या माध्यमातून कळाली आहे. एवढे सर्व सुरु असतांना रविवारी सकाळी दादर शिवाजीपार्क पोलिसाकडून मुंबईतील विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये गणिताच्या पेपरचे काही भाग आढळून आले त्यामुळे पेपरफुटीचे प्रकरण आणखी तापणार असल्याचे चित्र यावेळी दिसत आहे.
राज्यात बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडली असल्याची माहिती राज्य बोर्डाकडून देण्यात आली होती मात्र ३ मार्च रोजी बारावीचा गणित विषयाची प्रश्नपत्रिका व्हट्सएप ग्रुपवर व्हायरल झाली असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा पोलिस ठाणे हद्दीतील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेरून पेपर सुरू होण्याआधी अर्धा तास अगोदर गणिताच्या पेपरची दोन पाने व्हाटसअपवर व्हायरल झाली होती. विशेष बाब म्हणजे, राजेगावप्रमाणेच मुंबईतील एका परीक्षा केंद्रावरूनदेखील बरोबर १० वाजून १७ मिनिटांनी हा पेपर एका व्हाटसअपग्रूपवर व्हायरल झाला होता. त्यामुळे राजेगाव येथील पेपरफुटीचे मुंबई कनेक्शन चव्हाट्यावर आले आहे.
एका विद्यार्थ्यांकडून १० ते १२ हजार रुपये घेऊन हा पेपर फोडण्यात आल्याचा संशय निर्माण झालेला आहे. या पेपरफुटीप्रकरणामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन शिक्षकांनादेखील ताब्यात घेण्यात आलेले आहे तर दादर येथील डॉ. अँथोनी डिसिल्वा हायस्कूलमधील परीक्षार्थींच्या मोबाईलमधील दहा वाजून 17 मिनिटांनी गणिताचा पेपर सापडला. याप्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणचा तपास क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला आहे.
राज्यभरात आणखी कुठे कुठे अशाच पद्धतीने पेपर फुटला? याचाही तपास मुंबई पोलिस करत आहेत. पेपरफुटीसाठी ज्या व्हाट्सअप ग्रूपचा वापर करण्यात आला त्यात एकूण ९० जणांचा समावेश होता. त्यात काही शिक्षक, विद्यार्थी आणि इतरही काही व्यक्ती होते. टीव्ही चॅनेलवर पेपर फुटल्याची माहिती प्रसारित झाल्यानंतर संबधित ग्रुप त्वरित डिलीट करण्यात आले मात्र सायबर सेलकडून संबधित ग्रुप रिकव्हर करण्यात येत असल्याची माहिती यावेळी मिळाली आहे.